ऊस व राजकारणाच्या फडातील कोंबडीबाज बिबटे
हे एक रुपक असले तरी याचे वास्तव मात्र खूप जळजळीत आहे. नजिकच्या भविष्यकाळात यावर व संभाव्य धोक्यांवर उपाय होईल अशी चिन्हे नाहीत. परिणामी आजचे जंगल आणि राजकारण रिकामे ते रिकामेच राहील. पोकळ आशावाद अगतिक व भोळ्या समाजाला बळीचा बकरा बनवत राहील. गावोगावी राजकारण आणि उसाच्या फडात कोंबडीबाज बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उसाच्या फडातील बिबट पोटासाठी आणि राजकारणाच्या फडातील ‘ बिबट ’ नोटांसाठी आटापिटा करत आहेत. नोटांची गरज सगळ्यांना असते, कारण नोटांचा प्रश्न हा पोटाच्या प्रश्नाशी निगडीत आहे. पण सतरंजी उचलणाऱ्या कार्यकर्त्यांची अवस्था जशी, ‘ घर का ना घाट का ’ होते तशी बिबट्यांची अवस्था, ‘ न जंगल का न जमीन ’ का अशी झाली आहे. दोन्हीकडील स्थिती हादरे देणारी आहे. तुटलेल्या जंगलाने बिबट्यांचा लुटलेला संसार त्यांनी उसाच्या फडात थाटला. तिथेच पिलांना जन्म दिला आणि पोटासाठी शेती लगतच्या वस्त्यांवरती हल्ला केला, अशी ही इतकी सहज सोपी कथा नाही. जंगल तुटीने घर हरवलेल्या बिबट परिवाराची व्यथा आणि बिबट्यामुळे आपलं माणूस गमावून उध्...