मऱ्या
देवानेच डॉक्टरांच्या हातांना स्पर्श करुन पृथ्वीवर पाठवलेलं असतं. रुग्णांच्या वेदना थांबवण्यासाठी. परमेश्वर स्वतः येत नाही पण त्याच्या हाताच्या स्पर्शाने डॉक्टरांना पाठवतो. त्याचं नाव तसं रमाकांत होतं. या नावाचं इतरांना मोठं कौतूक वाटायचं. तो तसं आवर्जुन सांगायचा, “ माझं नाव रमाकांत हाई. ” हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर सवर्णी उमंग दिसायचा. पण वस्त्यांवर त्याच्या नावाचा भलताच अपभ्रंष झाला होता. जसं, आधी रमाकांतचा रम्या झाला आणि नंतर मऱ्या. आता त्याला सगळे मऱ्या म्हणूनच ओळखतात. खरं तर आता त्याला रमाकांत म्हणून हाक मारली तर तो ‘ ओ ’ पण द्यायाला विसरलाय. पण मऱ्या म्हटलं की धडपडत “ जी. ” म्हणत समोर उभं राहायचा. त्याच्या त्या भलत्याच लगबगीत अदब आणि दीनवाणा भेकडपणाही असायचा. “ इतका का रे आदबीनं उभा राहतोस. ” म्हणून त्याला विचारलं तर म्हणायचा, “ कायये ना भाऊ. वाटतं उगीच कुणी आपल्यावर नाराज व्हया नगं. कशाला कुणाचं बालंट. व्हय. तसं मला पोलिसांचा कमी आणि आमच्याच माणसांचा ज्यादा तरास असतो...